बुद्ध जयंती अडथळा निर्माण करणाऱ्या पोलिस निरीक्षक काळे यांना हटवा .. वैभव गीते
जयंतीच्या मिरवणुकीत अडथळा आणल्याचा पोलीस निरीक्षकांवर आरोप
फलटण:"युद्ध नको, बुद्ध पाहिजे" असा शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्ध जयंतीच्या मिरवणुकीला फलटणमध्ये गालबोट लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. फलटणचे पोलीस निरीक्षक स्वतःला शिस्तप्रिय समजतात, मात्र त्यांच्याच कार्यकाळात शहरात अवैध धंद्यांनी सीमा ओलांडली असून, संविधान मानणाऱ्या जयंती उत्सवात त्यांनी जाणीवपूर्वक अडथळा आणल्याचा आरोप 'नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस' (NDMJ) संघटनेने केला आहे.
शहरात सध्या मटका, गुटखा, जुगार आणि अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे. या काळ्या बाजारावर पोलीस प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी पोलीस प्रशासन केवळ कागदोपत्री शिस्त दाखवत असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे. "अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे धाडस न दाखवणारे पोलीस निरीक्षक शांततापूर्ण मार्गाने निघणाऱ्या भीम जयंती आणि बुद्ध जयंतीच्या मिरवणुकीत मात्र खोडा घालत आहेत," अशी टीका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
आजवर अनेक अधिकारी फलटणमध्ये आले आणि गेले, मात्र कोणीही बुद्ध जयंतीची मिरवणूक अडवण्याचा प्रयत्न केला नव्हता. संविधानिक मूल्यांचे पालन करणाऱ्या या जयंती उत्सवात पोलीस निरीक्षक काळे यांनी घेतलेली भूमिका ही संशयास्पद असून, त्यांच्या पाठीमागे नेमके कोणाचे पाठबळ आहे, याची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वैभव गीते, संघटनेचे राज्य सचिव उपविभागीय दक्षता समितीचे केंद्रीय नामनिर्देशित सदस्य, गोविंद मोरे आणि तालुकाध्यक्ष जय माने यांनी पोलीस प्रशासनाच्या या धोरणाचा तीव्र निषेध केला आहे.
पोलीस निरीक्षक काळे यांची तात्काळ बदली करून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदेशीर कारवाई करावी.
तालुक्यातील अवैध धंदे (मटका, दारू, गुटखा) त्वरित बंद करावेत.
समाजाच्या भावना दुखावल्याने
जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, यांनी या प्रकरणात लक्ष देऊन अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दक्षता समितीची बैठक बोलवावी. काळे यांना बडतर्फ करावे असे वैभवजी गीते हे बोलले आहे .
प्रशासनाने यावर त्वरित निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment