फलटणच्या बांधकाम विभागात 'भैया' राज? अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीने ठेकेदार आणि सामान्य जनता वेठीस!
फलटण (प्रतिनिधी):
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आपण अनेकदा 'भैया' संस्कृतीबद्दल ऐकले आहे, जिथे सत्तेच्या वरदहस्ताने काही ठराविक व्यक्ती संपूर्ण यंत्रणा चालवतात. मात्र, आता तसाच काहीसा प्रकार फलटण तालुक्यातही सुरू असल्याची चर्चा नागरिक आणि स्थानिक ठेकेदारांमध्ये रंगू लागली आहे. "आधी कामासाठी भैया शोधावे लागत होते, आता काम मिळवण्यासाठी भैयाची वाट पहावी लागते," अशा शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि इतर शासकीय विभागांतर्गत सध्या अनेक विकासकामे सुरू आहेत. मात्र, या कामांवर स्थानिक अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, एखादा ठेकेदार किंवा नागरिक कामासंदर्भात अधिकाऱ्यांकडे गेला असता, संबंधित अधिकारी सरळ सांगतात की, "आधी 'भैया'ला कॉल करा किंवा त्यांना भेटा." सत्ताधाऱ्यांच्या नावे 'दलाली'?
तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या (आमदार-खासदार) नावाचा वापर करून काही ठराविक व्यक्तींची 'भैया' म्हणून नेमणूक करण्यात आल्याची चर्चा आहे. हे 'भैया' कोण आहेत आणि त्यांचे अधिकार काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, ज्या लोकप्रतिनिधींच्या नावे हा कारभार सुरू आहे, त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे की त्यांना अंधारात ठेवले जात आहे? हा देखील संशोधनाचा विषय ठरत आहे.
यूपी-बिहार पेक्षाही बेक्कार परिस्थिती
नागरिकांमधून असा सूर उमटत आहे की, फलटणमध्ये सक्रिय असलेला हा 'भैया' उत्तर प्रदेशातील संस्कृतीपेक्षाही घातक ठरत आहे. चांगल्या दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना डावलून, ठराविक आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत आहे. "कामे देण्यामागे काही अर्थपूर्ण व्यवहार होत आहेत का?" असा सवालही आता उघडपणे विचारला जात आहे.
जनतेचा संतप्त सवाल: कोण आहे हा 'भैया'?
"पहिले युपी-बिहारमध्ये भैया पाहिले, आता फलटणमध्ये हा नवा 'भैया' कोण आला आहे ते तरी एकदा जनतेला दाखवा," अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे. अधिकाऱ्यांनी लोकशाही मार्गाने काम करण्याऐवजी अशा 'मध्यस्थां'च्या आहारी जाणे, हे फलटणच्या प्रशासकीय व्यवस्थेचे अध:पतन असल्याची भावना व्यक्त होत आहे.
आता या प्रकरणावर तालुक्यातील वरिष्ठ लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात आणि या 'भैया' संस्कृतीला लगाम घालतात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment