महावितरणचा भोंगळ कारभार: सुट्टीच्या दिवशी रिकाम्या कार्यालयात पंखे सुरूच; वीज बचतीचा संदेश देणाऱ्या विभागाकडूनच उधळपट्टी?
फलटण:
एकीकडे सर्वसामान्य नागरिकांनी वीज बिल वेळेत भरावे यासाठी तगादा लावणाऱ्या आणि वीज बचतीचे आवाहन करणाऱ्या महावितरण विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. ३१ मार्च रोजी सुट्टीचा दिवस असतानाही फलटण महावितरणच्या कार्यालयातील पंखे विनाकारण सुरू असल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे शासकीय विजेची मोठी नासाडी होत असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने सर्वत्र कामाची लगबग असते. मात्र, सुट्टीच्या दिवशी महावितरणचे कार्यालय सुरू आहे की बंद, याबाबत स्पष्टता नव्हती. कार्यालयात बिल भरण्यासाठी किंवा कामासाठी कोणतेही अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र होते. असे असतानाही कार्यालयातील सर्वच कक्षांमधील पंखे पूर्ण वेगाने सुरू असल्याचे निदर्शनास आले. जिथे कोणीही माणूस उपस्थित नव्हता, तिथेही तासनतास पंखे सुरू राहिल्याने महावितरणच्या या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सीसीटीव्ही तपासण्याची मागणी
हे पंखे नेमके कधीपासून सुरू आहेत आणि ते बंद करण्याची जबाबदारी कोणाची होती? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. "कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, म्हणजे दोषी कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर येईल," अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सर्वसामान्यांचे वीज बिल थकले की तत्काळ वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणने स्वतःच्या कार्यालयातील या उधळपट्टीकडे लक्ष का दिले नाही? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
यापुढील सविस्तर भाग महावितरण लोणंद विभाग
चौकशी ...? करण्याची मागणी ? भाग १
Comments
Post a Comment