वृक्ष झाले हैराण... उन्हाळा आला की येते आठवण! आबासो खांडेकर
फलटणची भूमी ही संतांच्या आणि शूरवीरांची भूमी म्हणून ओळखली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत या परिसराचे तापमान ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता निसर्गाचा कोप होतोय की काय, अशी भीती सरडे गावात वाटू लागली आहे. दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली आणि सूर्याने आग ओकायला सुरुवात केली की, आपल्याला अचानक वृक्षांची आणि त्यांच्या गारव्याची आठवण येते. पण प्रश्न हा आहे की, आपण झाडांची आठवण फक्त चटके बसू लागल्यावरच काढायची का?
एकेकाळी फलटणच्या आसपास असलेल्या बागा आणि रस्त्यांच्या कडेला असलेली मोठी झाडे आज विकासकामांच्या नावाखाली दिसेनाशी झाली आहेत. फलटण-सातारा किंवा फलटण-पुणे फलटण आसू की राजळे सरडे मार्गावर प्रवास करताना रस्ते रुंदीकरणात अनेक जुने वटवृक्ष आणि कडुनिंब सह अनेक झाडे तोडली गेली. याचा परिणाम आज शहरासह ग्रामीण भागात वाढत्या उष्णतेत स्पष्टपणे जाणवत आहे. सिमेंटची रस्ते नी घरे तापू लागली की आपल्याला त्या जुन्या कौलारू घरांची, तर जुन्या रस्त्यांची आणि अंगणातील त्या मोठ्या लिंबाच्या झाडाची प्रकर्षाने आठवण येते.
दुर्दैवाची गोष्ट अशी की, आपण सोयीसाठी झाडे तोडली, पण त्या बदल्यात नवीन झाडे लावण्याचे किंवा ती जगवण्याचे कष्ट घेतले नाहीत. आज फलटणमधील बाणगंगा नदीपात्र असो वा शहराचे उपनगर, असो की आहे गाव सगळीकडे वृक्षराजी कमी होत चालली आहे. पक्ष्यांना घरटे बांधायला जागा उरली नाही आणि माणसांना दोन मिनिटे थांबायला हक्काची सावली मिळेनाशी झाली आहे.
केवळ 'जागतिक पर्यावरण दिन' किंवा पावसाळ्यात फोटो काढण्यापुरते वृक्षारोपण करून उपयोग नाही. लावलेले झाड पुढच्या उन्हाळ्यापर्यंत जिवंत राहणे ही खरी गरज आहे. फलटणकर म्हणून तर आहे पण सरडे गावचा नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की, आपल्या घरासमोर, शेतात किंवा सार्वजनिक जागेत किमान एक झाड लावून ते दत्तक घ्यावे.
उन्हाळा संपला की वृक्षांचा विसर पडू देऊ नका. लक्षात ठेवा, वृक्ष आहेत तरच हा परिसर सुजलाम सुफलाम राहील. निसर्गाचा श्वास जिवंत ठेवण्यासाठी आजच कृती करण्याची वेळ आली आहे, अन्यथा पुढचा उन्हाळा यापेक्षाही दाहक असेल.
Comments
Post a Comment